आज विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सभागृहाला ओळख करुन दिली. त्यानंतर सादर झालेल्या शोकप्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या आठवणी सांगितल्या. एक मित्र, मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून दादांच्या स्वभावाचे पैलू त्यांनी उलगडले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, आज दादा आपल्यात नाहीत, ही खंत मनाला चटका लावणारी आहे, असे सांगताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. यंदा दादांनी आपला १२ वा अर्थसंकल्प सादर केला असता आणि पुढील वर्षी १३ वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. पुढील काळात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून त्यांचे नाव नोंदले गेले असते. मात्र अचानक त्यांच्या जाण्यामुळे ही परंपरा थांबली असल्याचे सीएम फडणवीसांनी सांगितले.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अजितदादा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो. मात्र, ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. एका अर्थाने ते माझे दादाच होते. २०१४ नंतर दोघांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली आणि एका दशकाहून अधिक काळ परस्परांमध्ये मैत्री व सुसंवाद राहिला. दादांचे अस्तित्व सभागृहात ठळकपणे जाणवायचे. प्रत्येक काम वेळेत आणि शिस्तीत व्हावे, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करण्याची त्यांची सवय होती असेही त्यांनी सांगितले.
२०१९ च्या शपथविधी बाबत काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार हे शब्दाला जागणारे नेते होते. याचा आम्ही २०१९ मध्ये अनुभव घेतला. त्यावेळी सरकार (भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस) करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वरिष्ठांनी निर्णय फिरवला. पण अजितदादा ठाम राहिले. दादांनी भूमिका घेतली मी शब्द दिलाय आणि तो मोडणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांना त्या निर्णयाची किंमत मोजावी लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्याविरोधात गेला. त्यानंतर सरकार स्थापन करणं शक्य नव्हते. त्यावेळी आम्ही दोघांनी वर्षा बंगल्यावर चर्चा केली. मी त्यांना सांगितले की, तुम्ही स्वतचा बळी द्यावा अशी आमचीदेखील अपेक्षा नाही असे सांगितले. तुमचा निर्णय घ्या असे मी त्यांना सुचवलं. अजितदादांनी वर्षा बंगल्यावरील चर्चेनंतर त्यांनी निर्णय बदलला, शेवटी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न होता. नंतरच्या सरकारमध्ये सहभागी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, अजितदादा हे अतिशय पारदर्शी होते. हे जे पोटात आहे ते ओठावर असलेले नेते होते. जे आहे ते तोंडावर बोलून टाकायचे. अशावेळी ते राजकीय परिणामांची पर्वा करत नसे.
