मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गटानं काँग्रेसला साथ दिली, तर कोल्हापुरात पुन्हा काँग्रेसची सत्ता येऊ शकते. पडद्यामागे जे सुरू आहे, ते आपण जाहीर करू शकत नाही, असं सूचक वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं आहे. सतेज पाटलांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
advertisement
कोल्हापुरात नक्की काय समीकरण असू शकतं?
खरं तर, महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजपला सत्तेवर यायचं असेल तर शिवसेना शिंदे गटाची साथ आवश्यक आहे. याच परिस्थितीचा फायदा एकनाथ शिंदे करून घेताना दिसत आहेत. त्यांनी मुंबईत महापौर पदासाठी फिल्डिंग लावली आहे. इथं भाजपनं शिंदेंना डावललं तर राज्यातीव विविध महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट वेगळा निर्णय घेऊ शकतो. त्यांच्यासमोर सत्तेचे विविध पर्याय आहेत.
अशा परिस्थितीत मुंबईत शिंदेना बाजुला केलं तर कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शिंदे गटासमोर आहे. याबाबत सतेज पाटील यांना विचारलें असता त्यांनी पडद्यामागं काय सुरू आहे, याची खुली चर्चा होत नसल्याचं म्हणत अधिक बोलणं टाळलं आहे. मात्र काँग्रेसचे ३४ आणि शिंदेंचे १५ एकत्र आल्यावर कोल्हापुरात सत्ता स्थापन करणं शक्य असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे मुंबईतील शिंदेंच्या नाराजीचा कोल्हापुरात काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता असून भाजपचा कंडका पडू शकतो, असं बोललं जात आहे.
कोल्हापुरात संख्याबळ कसं आहे?
८१ सदस्यसंख्या असलेल्या कोल्हापुरात सत्ता स्थापन करण्यासाठी ४२ हा जादुई आकडा आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. काँग्रेसने ३४ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा बहुमान मिळवला आहे. मात्र इथं भाजपनं २६ आणि शिवसेना शिंदे गटाने १५ जागा जिंकत बहुमताचा आकडा क्रॉस केला आहे. पण शिंदेंनी काँग्रेसला साथ दिली तर कोल्हापुरातील सगळं चित्र बदलू शकतं.
