महाराष्ट्राच्या राजकारणात सतत दौऱ्यावर असणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जात होते. हेलिकॉप्टर प्रवास सुरक्षित असला, तरी हवामानातील बदल, ढग, वारा आणि कमी दृश्यमानता यामुळे कधी कधी प्रवास थरारक ठरतो. अशाच एका अनुभवाचा किस्सा अजित पवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितला होता, जो आजही अनेकांना आठवतो.
काय घडलं होतं?
advertisement
जुलै 2024 मध्ये अजित पवार यांनी सांगितलेला हा प्रसंग गडचिरोली दौऱ्याशी संबंधित आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं. मात्र गडचिरोलीजवळ पोहोचताच आकाशात दाट ढग जमा झाले आणि हेलिकॉप्टर थेट ढगांच्या गर्दीत शिरलं. या वेळी हेलिकॉप्टरला जोरदार हेलकावे बसू लागले.
या अनुभवाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले होते, “हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला. इकडे-तिकडे पाहत होतो, सगळेच थोडेसे घाबरले होते.” मात्र याच वेळी त्यांच्यासोबत असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत शांत आणि निवांत दिसत होते.
अजित पवारांनी गंमतीशीर शैलीत पुढे सांगितले, “मी फडणवीसांना म्हणालो, आपण ढगात जातोय. तेव्हा ते अगदी सहजपणे म्हणाले, ‘घाबरू नका, माझे आतापर्यंत सहा अपघात झालेत, पण मला कधीच काही झालं नाही. मी हेलिकॉप्टरमध्ये असलो की काही होत नाही.’”
फडणवीसांच्या या आत्मविश्वासपूर्ण उत्तरानंतर वातावरण थोडं हलकं झालं आणि अखेर हेलिकॉप्टर सुखरूपपणे लँड झालं. हा किस्सा सांगताना अजित पवारांनी “ही त्यांच्या पूर्वजांची पुण्याई असावी,” असंही म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
