विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीनं मोठा विजय मिळवून सत्ता काबिज केली. राज्यातील जनतेनं दर्शवलेला विश्वास पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आलीय. या जबाबदारी पूर्ण करत असतना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानंही असणार आहेत.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी आधीच आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.
advertisement
मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजानंही आरक्षणासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठीही फडणवीसांना पाऊलं उचलावी लागणार आहेत. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं मोठं आव्हान फडणवीस यांच्यासमोर असेल.
दरम्यान मागील काही दिवसात कपाशी, सोयाबीनचा भाव घसरलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पिक मालांना चांगला भाव देण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना पेलावं लागणार आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं मोठं आव्हान आहे. राज्यात मोठे उद्योग आणून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावं लागणार आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 मध्ये सलग 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलाय. त्या अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीस आव्हानांवर कशा प्रकारे मात करतात? हे आगामी काळात स्पष्ट होईल,असे राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांनी सांगितले आहे.
