धाराशिव - महाराष्ट्र ही थोर संतांची, पराक्रमी महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगाला हेवा वाटेल असा आहे आणि हाच सांस्कृतिक वारसा नवरात्रीच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात एका नवरात्र महोत्सव मंडळाने मांडला आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
46 वर्ष जुन्या असलेल्या स्वामी विवेकानंद शारदीय नवरात्र महोत्सव मंडळाने हा सुंदर असा भक्ती शक्तीचा देखावा सादर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे महिषासुरमर्दिनी आई भवानीची आरती करतानाचा सुंदर हा सांस्कृतिक देखावा सर्वांचे लक्ष वेधून धेत आहे.
advertisement
1978 मध्ये स्वामी विवेकानंद शारदीय नवरात्र महोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले. गेल्या 46 वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील स्वामी विवेकानंद नवरात्र उत्सव मंडळ शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दरम्यान सांस्कृतिक देखावे सादर करीत आहे
विशेष म्हणजे मल्लिनाथ माशाळकर नंदू मुक्कावार, नागनाथ येळापुरे, त्यांच्यासोबत असलेले मुस्लिम समाजातील जाफरशेठ कारचे यांनी मिळून 1978 ला सर्वप्रथम देवीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत गेली 46 वर्षांपासून स्वामी विवेकानंद नवरात्र मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच विविध देखावे सादर केले जातात. 100 लेझीम संच असलेल्या या नवरात्रोत्सव मंडळांचे यावर्षीही विशेष कौतुक केले जात आहे.