मध्यरात्री नक्की काय घडलं?
कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ हा आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. सोमवारी भाजपच्या पत्रकांमधून पैसे वाटप केल्याचा आरोप या प्रभागात झाला होता. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री १० वाजेनंतर भाजपचे कार्यकर्ते मीटिंग घेत असल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. "रात्री १० नंतर आचारसंहिता असताना भाजपची मीटिंग कशी काय सुरू आहे?" असा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले.
advertisement
सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक चकमक घडली आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर थेट कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ कार्यकर्ते देखील जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
प्रभाग क्रमांक २९ हा सर्वात संवेदनशील प्रभाग असल्याचं माहिती असतानाही पोलिसांनी या ठिकाणी पुरेशी खबरदारी का घेतली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण इथं आधीच पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर प्रभागातील वातावरण तापलं होतं. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेणं आवश्यक होतं, असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती आहे. असं असलं तरी प्रभाग क्रमांक २९ मध्ये मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या प्रकारामुळे युतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या इथं तणावपूर्ण शांतता आहे.
