यंदा एल निनोचं सावट
यंदा मान्सूनवर एल निनो'चा प्रभाव पडण्याची शक्यता सुमारे ८० टक्के वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे एल निनो म्हणजे कमी पाऊस किंवा दुष्काळ असं समीकरण मानलं जातं. मात्र, माणिकराव खुळे यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान एक वेगळा पैलू उलगडून सांगितला. फक्त एल निनो सक्रिय झाला म्हणजे दुष्काळ पडतोच असं नाही. २०१९ सालचं उदाहरण घ्या, तेव्हाही एल निनो होता, पण 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) पॉझिटिव्ह असल्यामुळे महाराष्ट्रात विक्रमी पाऊस झाला होता. सध्या आयओडी 'तटस्थ' स्थितीत आहे. त्यामुळे मान्सूनचा नेमका पल्ला १५ एप्रिलच्या अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होईल. तो येईपर्यंत थोडी वाट पाहायला हवी, पाऊस कमी होणार हे म्हणणं घाईचं ठरू शकतं.
advertisement
गुढीपाडव्याला पावसाचं सावट; पण गारपिटीची भीती किती?
येत्या १८, १९ आणि २० मार्चला राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा आणि मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांमध्ये सध्या गारपिटीची मोठी दहशत आहे. "गारपीट होण्यासाठी हवेच्या वरच्या थरात विशिष्ट 'फ्रीझिंग पॉईंट' असावा लागतो. सध्याची स्थिती पाहता, २२ मार्चपर्यंत मोठी गारपीट होण्याची शक्यता दिसत नाही. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक स्थितीत दोन मिनिटे गारा पडल्या तर त्याला संपूर्ण हवामान प्रणाली कारणीभूत नसते. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी किंवा फळ उत्पादकांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही."
मार्चमध्ये उन्हाचा तडाखा कमीच राहणार?
फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने मार्चमध्ये भीषण उष्णता जाणवेल, असा अंदाज होता. पण माणिकराव खुळे यांच्या मते, मार्च महिना फारसा तापदायक असणार नाही. ३० मार्चपर्यंत तरी तापमान सरासरीच्या खाली किंवा आसपासच राहील. एप्रिल आणि मे महिन्यात मात्र उष्णतेच्या झळा खऱ्या अर्थाने जाणवायला सुरुवात होईल. मार्चमधील अवकाळी वातावरणामुळे उन्हाचा कडाका सध्या काहीसा कमी झाला आहे.
साधारणपणे 15 एप्रिलपर्यंत वातावरण थोडं दिलासादायक राहील. त्यानंतर पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनीही काळजी घ्यावी. पावसामुळे सकाळी आणि रात्री उशिरा हवेत गारवा निर्माण होत आहे. मात्र 12 ते 4 उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने घराबाहेर पडताना काळजी घ्या असंही सांगितलं आहे. १५ एप्रिलनंतर मान्सूनबाबतच चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सध्या मान्सूनसाठी वेट अॅण्ड वॉचची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
