हवामान तज्ज महेश पलावत यांनी सांगितला धोका
'हवामान तज्ज्ञ महेश पलावत' यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोमुळे यावेळी पावसाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. सध्या प्रशांत महासागरात ला निनाची परिस्थिती आहे, ज्यामुळे आपल्याला आतापर्यंत चांगला झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र, हे चित्र आता बदलणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मार्च महिन्यापर्यंत समुद्र पृष्ठभागाचे तापमान सामान्य होईल. पण खरी काळजी मान्सूनच्या काळातली आहे.
advertisement
मे, जून आणि जुलै या महिन्यांपासून समुद्र हळूहळू उबदार होऊ लागेल आणि 'एल निनो' डोकं वर काढेल. जेव्हा एल निनो विकसित होण्याच्या स्थितीत असतो, तेव्हा तो मान्सूनसाठी अत्यंत घातक मानला जातो. यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता दाट असते.
बळीराजाच्या चिंतेत भर
मागच्या काही वर्षांचा अनुभव पाहिला तर २०२३ मध्ये एल निनोमुळे पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर २०२४-२५ मध्ये परिस्थिती सुधारली आणि पाऊस चांगला झाला. आता पुन्हा २०२६ मध्ये हीच परिस्थिती ओढवणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
मान्सूनवर एल निनोचा नेमका किती मोठा प्रभाव पडेल, हे मार्च-एप्रिलमध्ये अधिक स्पष्ट होईल. मान्सूनच्या चिंतेसोबतच सध्या देशात थंडीचा कडाकाही वाढणार आहे. उत्तर भारतात विशेषतः पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये तापमानाचा पारा प्रचंड खाली घसरणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
महाराष्ट्रातही हुडहुडी वाढणार
महाराष्ट्रातील जनतेसाठीही थंडीची बातमी महत्त्वाची आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे. रात्रीची थंडी वाढणार असून नागरिकांना हुडहुडी भरवणारा गारवा अनुभवायला मिळेल. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुक्यामुळे सूर्यदर्शन दुरापास्त होण्याची शक्यता आहे.
एकीकडे उत्तर आणि मध्य भारत थंडीने गारठला असताना, दक्षिण भारतात मात्र पावसाची हजेरी पाहायला मिळेल. येत्या ७-८ जानेवारीपासून तामिळनाडूच्या किनारी भागात पावसाला सुरुवात होईल. १० ते ११ जानेवारी दरम्यान संपूर्ण तामिळनाडू आणि श्रीलंकेत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
