फाल्गुनी राजेश शहा (४६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या ओम नगरच्याच रहिवासी होत्या. नवरात्रोत्सव सुरू असल्याने त्या दररोजप्रमाणे उत्साहाने गरबा खेळण्यासाठी मंडळात गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गरबा खेळत असताना अचानक फाल्गुनी शहा यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना चक्कर येऊन त्या जागीच कोसळल्या.
हा प्रकार पाहताच गरबा आयोजक आणि उपस्थित लोकांनी तातडीने त्यांना जवळच्या योग्यम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, उपचारांदरम्यानच फाल्गुनी शहा यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
प्राथमिक अंदाजानुसार, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण ओम नगर परिसरात आणि वसईतील नवरात्रोत्सव मंडळांमध्ये शोककळा पसरली आहे. उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.