छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असणाऱ्या खादगाव येथे चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या आणि अपमानित झालेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय शेषराव कोहकडे असे आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील खादगाव खेर्डा रस्त्यावर आत्महत्या केलेल्या संजय कोहकडे यांची शेतजमीन आहे. ठेकेदाराने रस्त्यासाठी खोदलेल्या दुतर्फा नालीचे इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी शेतात जात असल्याची तक्रार तलाठी यांच्याकडे करण्यात आली होती. मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे यांनी पंचनामासाठी घटनास्थळी पाहणी केली.
advertisement
पाहणी आणि पंचनामा करताना प्रतिवादी शेतकरी आणि कोहकडे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आमचे ऐकून घ्या अशी कोहकडे कुटुंबाची अधिकाऱ्यांना विनंती केली. अधिकाऱ्यांनी ऐकून न घेता उलट तक्रारदार शेतकऱ्यांनाच प्रश्न आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. सर्वांसमोर अपमान सहन न झाल्याने आणि मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या शेतकऱ्याची विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतल्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मंडळाधिकारी, तलाठी आणि प्रतिवादी शेतकऱ्याविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उत्तरणीय तपासणी आणि अंत्यसंस्कारास हरकत घेत पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले नंतर नातेवाईकांनी संजय कोहकडे याचा मृतदेह ताब्यात घेतला. आमच्या वर अन्याय झालाय सर्वांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आता कुटुंबियांनी केली आहे.
महिला अधिकाऱ्यामुळे माझे मालक मला सोडून गेले, पत्नीने टाहो फोडला
पंचनामा करण्यासाठी अधिकारी आले होते त्यातील एक महिला अधिकारी माझ्या नवऱ्याला खूप बोलल्या त्यामुळे त्यांना ते सहन झाला नाही. कुणाला काहीही न सांगता ते सरळ विहिरीच्या दिशेने धावत गेले आणि विहिरीमध्ये पुढे घेऊन आत्महत्या केली. माझ्या नवऱ्याला महिला अधिकारी बोलल्यामुळेच माझे मालक मला सोडून गेले, या महिला अधिकाऱ्याला लवकर अटक करा अशी मागणी संजय कोहकडे यांच्या पत्नीने केली.
काकाच्या मृत्यूला महिला अधिकारी जबाबदार, पुतणीचा आरोप
काल आम्ही दिलेल्या तक्रारीनंतर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी लक्ष्मीकांत गोजरे आणि ज्यांनी शेतात पाणी सोडले होते ते डाके कुटुंबीय ज्या ठिकाणी शेतात पाणी सोडले होते त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना आमची अडचण सांगत होतो पण मंडळ अधिकारी शिंदे या ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. शेतावर येण्याअगोदर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी लक्ष्मण गोजरे हे आमच्या विरोधात असलेल्या डाके कुटुंबाच्या घरी दोन तास बसलेले होते. त्यानंतर शेतात आल्यानंतर आमचे काहीच ऐकून घ्यायला हे अधिकारी तयार नव्हते, महिला अधिकारी शिंदे यांनी उलट प्रश्न माझ्या काकाला सुरू केले आणि खूप काही बोलायला लागल्या त्यानंतर काकाला ते सहन झाले नाही आणि ते विहिरीकडे धावत जाऊन विहिरीमध्ये उडी घेतली. तरी यांच्यामधील कुणीच वाचवायला आले नाही आणि कुणाला फोनही केले नाही. त्यामुळे माझ्या काकाच्या मृत्यूला ही महिला अधिकारी जबाबदार आहे तिला पहिले अटक करा अशी आर्तहाक संजय कोहकडे यांच्या पुतणीने दिली.
संजय कोहकडे यांच्या कुटुंबाची पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी भेट घेतली असून, मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून जी काही मदत करता येईल ती करू कसे त्यांनी म्हटले आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
अधिकाऱ्यांच्या चुकीच्या बोलण्यामुळे आणि शेतकऱ्याची तक्रार ऐकून न घेता त्याच्यासोबत वाद घातल्यामुळे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला. त्यामुळे अनेक वेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या अधिकाऱ्यांना सांगितल्या पाहिजे आणि त्यातून मार्ग काढले पाहिजे असे सांगितले जाते. मात्र याच अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांचा बळी जात असेल तर सरकारला याकडे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सोबतच याची सखोल चौकशी करून आपले कर्तव्य न निभवता शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.