जान्हवी मोरे असं या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे. ती सहा महिन्यांची गर्भवती होती. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील बोहार्डी हे जान्हवीचं माहेर आहे. दिवाळीनंतर ती माहेरी आलेली होती. 10 दिवस माहेरी राहिल्यानंतर, ती पती संग्राम यांच्यासोबत कारने छत्रपती संभाजीनगरला जात होती. कारमध्ये पती-पत्नी असे दोघेच होते. रस्त्यात वाकोद गावाजवळ त्यांची कार दुभाजकावर आदळली.
advertisement
वाकोद परिसरात शोककळा
या अपघातामुळे कारचे दरवाजे लॉक झाले होते. अपघाताचा आवाज ऐकून आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत कारने पेट घ्यायला सुरुवात झाली होती. लोकांनी ड्रायव्हर साईडचा दरवाजा तोडून संग्राम यांना बाहेर काढलं. पण त्यानंतर कार पूर्णपणे पेटली. त्यामुळं बाजूला बसलेल्या जान्हवी यांना बाहेर काढता आलं नाही. त्यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला.मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे वाकोद परिसरात शोककळा पसरली आहे. एका नवजीवनाच्या प्रतीक्षेत असलेले कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे गाडी जळून एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. माहेराहून परतताना या महिलेवर काळाने घाला घातला आहे. विशेष म्हणजे पतीच्या समोरच पत्नी जान्हवी मोरे हिचा होरपळून मृत्यू झाला आहे. आरटीओ कारवाईच्या भीतीने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. महामार्गावर गाड्यांची तपासणी केली जात होती. याच पोलिसांना बघून चालक संग्राम मोरे घाबरले. त्यांच्याकडे कार चालवण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांना चुकवण्याच्या नादात त्यांची गाडी महामार्गावरील दुभाजकाला धडकली.
पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात
दरम्यान गुरूवारी संध्याकाळी झालेल्या अपघाताच्या घटनेने पुणे हादरले आहे. पुण्याच्या नवले पुलावर दोन कंटेनर आणि कारची धडक होऊन विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या तीनही गाड्या एकाच दिशेने भरधाव वेगाने धावत होत्या. याच दरम्यान एका कंटेनर चालकाच्या गाडीचा ब्रेक झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या कारची आणि कंटेनरची धडक बसली. या धडकेनंतर दोन्ही कंटेनरने अचानक पेट घेतला होता.या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत.
