अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. "जगदीश, मला माफ करा. माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही..." अकुलखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी देवानंद धनगर याने अनिताच्या पतीला पाठवण्यासाठी हा मेसेज टाईप करून ठेवला होता. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. तो मेसेज सेंड व्हायच्या आतच रक्ताचा सडा पडला आणि दोन आयुष्यांचा करुण अंत झाला.
advertisement
काय होतं त्या मेसेजमध्ये?
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंदच्या मोबाईलमध्ये एक अनसेंड (Unsent) मेसेज सापडला आहे. त्यात त्याने लिहिले होते की, "मला ती (अनिता) टाळत आहे, दुसऱ्यासोबत बोलते. मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही". आपल्या प्रेयसीचा संशय आणि विरहाच्या वेदनेतून त्याने हा शेवटचा निरोप टाईप केला होता, मात्र तो क्लिक करण्यापूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
विवाहित प्रियकराचा माथेफिरूपणा
अनिता जगदीश पाटील आणि देवानंद सुभाष धनगर (२६) यांचे गेल्या ४-५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावरून झालेली ही ओळख प्रेमात बदलली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिताने प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे देवानंद संतापला होता. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने मोटारसायकलने अकुलखेडा गाठले. तिथे दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले.
अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम
देवानंदने आपल्यासोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून आधी अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर काही क्षणातच स्वतःवरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. हॉटेल संकेतच्या मागे असलेल्या प्लॉट भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जर तो मेसेज वेळेत सेंड झाला असता किंवा कोणाला सुगावा लागला असता, तर कदाचित हे हत्याकांड टळले असते, अशी चर्चा आता गावात सुरू आहे. ही घटना घडली तेव्हा अनिताचे पती जगदीश पाटील हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते.
