जालना - शेतकरी विविध आव्हानांचा सामना करत असतानाही शेतामध्ये विविध प्रयोग करत असतात. अनेकदा या प्रयोगांना अपयशही येते. मात्र, तरीही शेतकरी जिद्दीने प्रयत्न करत राहतात. अशाच एका शेतकऱ्याने एक प्रयोग केला आणि त्यांनी त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल रिपोर्ट.
जालना जिल्ह्यातील कडवंची आणि नंदापूर ही गावे जालन्याचा द्राक्ष बेल्ट म्हणून ओळखली जातात. याच गावातील शेतकरी कृष्णा क्षीरसागर हे देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, कोरोना लॉकडाऊनमध्ये झालेला घाटा भरून काढण्यासाठी ते सीताफळ शेतीकडे वळले आणि त्यातून त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे. मागील वर्षी सीताफळ शेतीतून त्यांना तब्बल 12 लाखांचे उत्पन्न झाले तर यंदा 15 लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. कृष्णा क्षीरसागर यांनी सिताफळ बागेचे काटेकोर नियोजन कसे केले, याबाबत लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
advertisement
कोरोना काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. क्षीरसागर हे सुद्धा त्या शेतकऱ्यांपैकी एक आहेत. द्राक्ष उत्पादक म्हणून परिसरात ख्याती असलेल्या क्षीरसागर यांना मोठे नुकसान सहन करावे लागल्याने दुसरे काहीतरी उत्पन्नाचे साधन असलेले पीक घ्यावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर मित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांनी बळीराजा गोल्डन नावाच्या सिताफळ वाणाची आपल्या शेतामध्ये 15 बाय 6 या अंतरावर लागवड केली.
2018 मध्ये त्यांनी अडीच एकर क्षेत्रामध्ये 900 सिताफळ झाडांची लागवड केली. 2021 मध्ये यापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाले. सुरुवातीला 2 लाख मग 2022 ला 5 लाख तर 2023 मध्ये त्यांना तब्बल 12 लाखांचे उत्पन्न या शेताफळ शेतीमधून मिळाले. यानंतर 2023 मध्ये तब्बल 20 टन सीताफळांचे उत्पादन झाले. तर यंदा 2024 मध्ये 25 टन सीताफळचे उत्पन्न त्यांना अपेक्षित असून यामधून 15 लाख रुपये उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे.
गुणवत्ता उत्तम असेल तर बाजारात दरही उत्तम मिळतो, याचा मला अनुभव आहे. यामुळेच फळांची गुणवत्ता राखण्यासाठी फळांना फ्रुट प्रोटेक्शन बॅग बसवल्या आहेत. त्याचबरोबर एका फार्म प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून या सिताफळला दुबईत निर्यात करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. या सीताफळच्या प्लॉटला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने विकसित केले आहे. यामुळे फळांची गुणवत्ता उत्तम राहत असून 148 रुपये प्रति किलोपर्यंत दर आपल्या सीताफळांना मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करणारे पीक म्हणून हे पीक पुढे येत असल्याचे कृष्णा शिरसागर यांनी सांगितले.