नैतिक सदाशिव सोनुने असं आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय मुलाचं नाव आहे. तो भोकरदन तालुक्यातील लेहा गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो गावातील शाळेत दहाव्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसांपासून त्याने आणि त्याच्या काही मित्रांनी दुचाकीने तुळजापूरला दर्शनासाठी जाण्याची तयारी केली होती. नैतिकने याबाबत घरी वारंवार तगादा लावून धरला होता.
advertisement
परंतु, सध्या पावसाचे दिवस असल्याने आणि वातावरण खराब असल्याने आईने त्याला तुळजापूरला जाण्यास नकार दिला. पाऊस उघडल्यावर आपण सर्वजण सोबत जाऊ, असेही आईने त्याला सांगितले. पण मित्रांसोबत जायचं प्लॅनिंग केलं असताना आई वडिलांकडून अशाप्रकारे आडकाठी आणली गेल्याने नैतिक दुखावला.
शनिवारी आई शेतात भुईमुगाच्या शेंगा गोळा करण्याचं काम करीत होती, तर वडीलही कामात होते. त्याचे आजोबा गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते. त्याच वेळी त्याने घरात कुणीही नसताना नैतिक गळफास घेऊन आत्महत्या केली. आजोबा घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून डोकावलं असता नैतिकने गळफास घेतल्याचे दिसून आले.
हा प्रकार उघडकीस येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. एकलुत्या एक मुलाने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.