राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन देशमुख यांना मारहाण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी विनंती केली. पोलिसांची कडेकोड सुरक्षा व्यवस्था असताना जर लोकशाहीच्या मंदिरात असे प्रकार होणार असतील तर राज्यात कायदा सुव्यवस्था कशी असेल? याचा विचार न केलेला बरा, अशी टीका आव्हाड यांनी केली.
advertisement
मकोका गुन्ह्यातले आरोपी मारहाणीसाठी विधिमंडळात?
गेल्या काही दिवसांपासून त्यांची माझ्यावर नजर होती. त्यांचे मलाच मारण्याचे प्लॅनिंग होते. मकोकाचे आरोपी अशा पद्धतीने विधान भवनात कसे येतात? सभागृहाची परंपरा वगैरे काही आहे की नाही? जो प्रकार झाला त्याने मला खूप मानसिक त्रास झाला आहे. सहा वेळेस निवडून आलेल्या आमदाराला मारायला कुठल्या पद्धतीचे लोक विधान भवनात आणली होती? ज्यांनी मारहाण केली ते कार्यकर्ते वगैरे नव्हते. ते मकोकातले खून दरोड्यातले आरोपी होते, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.
...तर नितीनच्या जागी मी असतो-आव्हाड
तो माणूस आतमध्ये येतो, माझ्याकडे रागाने बघतो. गेले दोन तीन दिवस डोळे वटारून माझ्याकडे बघितलं जाते. आज झालेली घटना मुख्यमंत्री फडणवीस गांभीर्याने घेतील. मला त्या माणसाबद्दल (गोपीचंद पडळकर) काहीही विचारू नका. सव्वा तास भाषण केल्यावर मी निघून गेलो. जर मी नेहमी प्रमाणे चालत असतो तर नितीनच्या जागी मी असतो. सभागृहाच्या पटलावर हा सगळा प्रकार मी मांडला आहे. आता राजकीय संस्कृती कुठे राहिली आहे...? माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्याने मार खाल्ला, मला त्याचे फार वाईट वाटते आहे, अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त केली.