पावसाळा सुरू झाला की आजकाल बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये पर्यटन कंपन्यांकडून चिखल महोत्सव आयोजित केले जाऊ लागले आहेत. यामध्ये तयार केलेल्या चिखलात मनसोक्त लोळण्याचा आनंद नागरिकांना घेता येतो. त्याचबरोबर रस्सीखेच, कबड्डी असे काही खेळही या चिखलातच खेळता येतात. तर बऱ्याच वेळेला गावाकडच्या शेतीच्या गोष्टी देखील खेळ महोत्सवाच्या निमित्ताने करण्याची संधी नागरिकांना दिली जाते. त्यामुळे नागरिक मोठ्या हौसेने या चिखल महोत्सवात सहभागी होत आहेत. मात्र या चिखल महोत्सवात सहभागी होताना आपण काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे असे डॉ. विजय राऊत म्हणाले.
advertisement
काय काय होऊ शकते इन्फेक्शन?
डॉक्टर विजय राऊत यांनी सांगितले की, मातीतून किंवा चिखलातून बॅक्टेरियल, फंगल किंवा पॅरासिटीक अशा प्रकारचे इन्फेक्शन शरीराला होऊ शकते. आपण ज्या चिखलात किंवा मातीत खेळत आहोत त्यामध्ये शेताच्या मातीत मिसळलेली कीडनाशके, प्राण्यांची विष्ठा, फुलांचे पराग कण आदी विविध गोष्टी मिसळलेल्या असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
पंचगंगा - कृष्णेचा नृसिंहवाडीत जलाभिषेक, दक्षिणद्वार सोहळ्याला भक्तांची मांदियाळी
• बॅक्टेरियल इन्फेक्शन : बऱ्याचदा चिखलात जाताना व्यक्तीला आधीच एखादी जखम असेल किंवा चिखलात खेळताना झालेल्या जखमेतून मातीचे किंवा चिखलाचे पाणी शरीरात जाऊ शकते. त्यातून जिवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे कधीकधी धनुर्वात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
• फंगल इन्फेक्शन : मातीत बराच वेळ खेळल्यानंतर पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होऊ शकतात. तसेच नायटा, गजकर्ण असे त्रास देखील उद्भवू शकतात.
• पॅरासिटीक इन्फेक्शन : लहान मुलांना जंतचा त्रास असतो. चिखलात खेळल्याने जंताचा त्रास होऊ शकतो.
लहान मुलांना होऊ शकतो त्रास
बऱ्याचदा शहरातील मुलांना मातीमध्ये किंवा अशा वातावरणात वावरण्याची सवय नसते. त्यामुळे अचानक एखाद्या दिवशी अशाप्रकारे चिखलात खेळल्यामुळे त्यांना ऍलर्जीचा त्रास उद्भवू शकतो. त्याचबरोबर माती मिश्रित पाणी नाकातोंडातून शरीरात गेले तर न्युमोनिया सारखा आजार होण्याची देखील शक्यता असते.
काय घ्यावी काळजी..?
चिखल महोत्सवासाठी जाताना आपल्या शरीराला कोणतीही जखम होऊ नये, यासाठी अंगभरून कपडे घालणे गरजेचे आहे. चिखलाचे पाणी नाका-तोंडात किंवा डोळ्यात जाऊ नये याची खबरदारी बाळगावी. चिखलात वावरताना जखम होऊ शकेल, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी असतील तर त्या तात्काळ बाजूला कराव्यात. काळजी घेऊनही एखाद्या व्यक्तीला जर काही जखम झालीच, तर त्या व्यक्तीने लगेचच स्वच्छ पाण्याने शरीर स्वच्छ करणे आवश्यक आहे.
दरम्यान, चिखल महोत्सव साजरा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास, शरीरावर काहीही अलर्जी सदृश्य दिसून येत असल्यास वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील डॉ. विजय राऊत यांनी केले आहे.