कामगार संघटनांच्या सूचना आणि मागण्यांचा विचार करून धोरण तयार करण्यात येईल. राज्यातील कामगारांच्या आरोग्य, आर्थिक व कौटुंबिक हितांचा सर्वांगीण विचार करूनच नवे नियम करण्यात येतील, असे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटले.
भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव ए.आय.कुंदन, कामगार आयुक्त डॉ.तुम्मोड तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
advertisement
मंत्री फुंडकर म्हणाले की, अनेक दशकांपासून असलेले नियम बदलत्या काळानुसार अपुरे ठरत असल्याने त्यात सुधारणा आवश्यक आहे. हे बदल केवळ औपचारिक न राहता ते कामगारांच्या हिताचे व सर्वसमावेशक असले पाहिजे. कामगारांचा प्रतिसाद, सहभाग व सुचना घेऊनच पुढील निर्णय होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
कामगारांच्या नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी एसओपी तयार करण्यात येणार असून त्यांचा अभ्यास करण्यासाठी ती कामगार संघटनांना देण्यात येणार आहे. यात कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे. कामगारांच्या सामाजिक सुरक्षेपासून ते आर्थिक, कौटुंबिक अडचणींपर्यंत सर्वांगीण विचार करून सकारात्मक व हितकारक बदल नियमांमध्ये केले जातील. तसेच केलेल्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कामगार विभाग प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.