पुणे : इंदापूरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सलग तिसऱ्यांदा हार पत्करावी लागली आहे, यावेळी मात्र, त्यांचा पराभव हा मराठा मतांमधील विभाजनामुळे झाल्याचं स्पष्ट होतंय. धनगर समाजाचे दत्ता भरणे सलग तिसऱ्यांदा इंदापूरचे आमदार बनलेत, पण यावेळच्या विजयातील एक फरक अगदी स्पष्ट आहे आणि तो म्हणजे मराठा समाजातील मतविभाजनामुळेच हर्षवर्धन पाटलांचा पराभव झालाय.
advertisement
पवार गटाचे बंडखोर प्रवीण माने यांनी तब्बल 37,917 मतं घेतल्याने दत्ता मामा भरणेंचा विजय सुकर बनला. दत्तामामा भरणेंना 1,17,236 मतं तर हर्षवर्धन पाटलांना 97,836 मतं पडली आहेत. मराठा मतांच्या विभागणीमुळे हर्षवर्धन पाटलांना 19,410 मतांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. गेल्यावेळी हाच फरक अवघ्या 3 हजार मतांचा होता.
जातीय समीकरणाचा फटका
इंदापूरच्या मतदारसंघात जातीय समीकरणंही महत्त्वाची ठरली. इंदापुरात 60 ते 62 हजार धनगर समाजाची तर अंदाजे 1 लाख 5 हजार मराठा समाजाची आणि 30 ते 35 हजार माळी समाजाची मतं आहेत. या आकडेवारीवरून यावेळी हर्षवर्धन पाटलांचं पारडं तसं वरकरणी जड वाटत होतं, कारण त्यांच्यासोबत शरद पवार होते.
लोकसभेलाही इंदापुरातून तुतारीला 25 हजारांचे लीड मिळाल्याने हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडून पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी देताच तिकडे सोनाईच्या प्रवीण माने यांनी बंडखोरी केली, त्यामुळे आपसूकच मराठा मतं विभागली गेली, त्यामुळे दत्तामामा भरणे पुन्हा आमदार बनले.
इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील घराण्याचं खरंतर बारामतीच्या पवारांशा कधीच पटायचं नाही, पण यावेळी पवारांच्या घरातच फूट पडल्याने अजितदादांच्या त्रासाला कंटाळलेल्या हर्षवर्धन पाटलांनी लागलीच थोरल्या पवारांची तुतारी घेऊन आपला बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याचा प्रयत्न केला, पण पवार प्रवीण मानेंची बंडखोरी रोखू न शकल्याने हर्षवर्धन पाटलांच्या पदरी पुन्हा निराशाच आलीय.
