मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येणार असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठता आला नाही तर काय यासाठी आता महायुतीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महायुती लहान लहान घटक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी महायुतीने प्लॅन बी तयार केला आहे.
advertisement
महायुतीच्या नेत्यांकडून आमचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तरीही बहुमातापासून दूर राहिल्यास लहान पक्षांसोबत महायुतीच्या नेत्यांनी बोलणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लहान घटक पक्षांना सोबत घेऊन महायुतीचं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सरकार स्थापनेसाठी पाठिंबा घेताना सत्तेतला वाटा घटक पक्षांना दिला जाईल अशीही माहिती समजते.
महायुतीकडून महाविकास आघाडीत नसलेल्या आणि स्वतंत्र लढलेल्या घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. यात बहुजन विकास आघाडी, मनसे आणि प्रहार जनशक्ती यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. या लहान पक्षांच्या नेत्यांशी महायुतीचा संपर्क सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मविआच्या नेत्यांची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधण्यास महाविकास आघाडीकडून सुरुवात झालीय. जे उमेदवार विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांच्या संपर्कात महाविकास आघाडीचे नेते आहेत. निकालाच्या दिवशी राज्यभरातल्या मतमोजणी केंद्रांवर मविआच्या नेत्यांचं लक्ष असणार आहे.
