बंडखोरांमुळे विजयाचे समीकरण अटीतटीचे !
भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्याने अमळनेर आणि जळगाव शहरात मत विभाजन होणार आहे. मतविभाजन, नोटाला मिळणारी मते कोणत्याही घटकापेक्षा निर्णायक ठरू शकतात. तर मनसे, प्रहार, वंचित अनेकांचे गणित बिघडवू शकते. जळगावसह अमळनेरात भाजप बंडखोरामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. या दोघं ठिकाणी त्या-त्या पक्षाच्या उमेदवारांना एकाचवेळी विरोधकांसह बंडखोरांशी लढण्यावर वेळ खर्ची घालावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर, बंडखोरांमुळे विजयाचे समीकरण अटीतटीचे राहील. त्यात प्रचारासोबतच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान असेल. यात जो यशस्वी होईल, तोच उमेदवार विजयाच्या जवळ जाईल असे चित्र आहे. त्यातही ज्या उमेदवाराकडे मतदान बाहेर काढण्याची प्रभावी यंत्रणा आहे, त्यांनाच हे गणित साधणे सोयीचे होईल.
advertisement
जाणून घेऊ या...जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील एकूण घडामोडी !
जळगाव शहर विधानसभा मतदार संघात भाजपने नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून राजूमामा भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेले माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी केली. राहिलेली कसर भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी पूर्ण केली. ज्या गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची सूत्र हाती घेत भाजपला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. तेच गिरीशभाऊ बंडखोरांसमोर हतबल झाल्याचे दिसून आले. सर्वात धक्कादायक म्हणजे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याबाबत माघारीच्या आदल्या रात्री सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सोनावणे हे अंतिम क्षणापर्यंत आपल्या उमेदवारी ठाम राहिले. अगदी सोनवणे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय विश्लेषकही बुचकळ्यात पडले आहेत. तर दुसरीकडे आमदार सुरेश भोळे यांनी या बंडखोरीवर एका शब्दाचीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय, हे विशेष !
जळगाव विधानसभा मतदार संघासह उमेदवारांची थोडक्यात माहिती !
जळगाव शहर मतदारसंघाचे वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर संपूर्ण जळगाव शहराचा या मतदार संघात समावेश होते. लेवा पाटील, मराठ, मुस्लिम, दलित, जैन, सिंधी समाजाची मते या मतदार संघात निर्णायक आहेत. बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे जळगाव शहर मतदार संघात जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक २९ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष बंडखोर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी देखील बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. आता सुरेश भोळे (भाजप), जयश्री महाजन (शिवसेना ठाकरे गट), डॉ. अनुज पाटील (मनसे), ललित घोगले (वंचित), डॉ. आश्विन सोनवणे (अपक्ष-भाजप बंडखोर), कुलभूषण पाटील (अपक्ष-उबाठा बंडखोर), हे उमेदवार रिंगणात आहेत.
जाणून घेऊ या...अमळनेर विधानसभा मतदार संघातील एकूण घडामोडी !
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांची बंडखोरी महायुती पर्यायी भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. यामुळे राज्यभरात “संकटमोचक”म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांना अखेर स्वतःच्याच जळगाव जिल्ह्यात मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. बंडखोरांनी माघार न घेतल्यामुळे “संकटमोचकां”ची मनधरणी ठरली निष्फळ ठरल्याचेही सामोरे आले आहे.
अमळनेर मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपचे बंडखोर तथा मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिरीष चौधरी यांची मनधरणी भाजपकडून सुरु आहे किंवा नाही?, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु शिरीष चौधरी हे आपल्या उमेदवारीवर अर्ज दाखल केल्यापासून ठाम होते. अगदी प्रचारातही ते खूप पुढे निघून गेले होते. त्यामुळे शिरीष चौधरी यांचे बंड शांत करण्याचे फार प्रयत्न गिरीशभाऊ यांनी केल्याचे दिसून आले नाही. किंबहुना शिरीष चौधरी हे ऐकणारच नाहीत, हे अपेक्षित असल्यामुळे गिरीशभाऊ यांनी प्रयत्नच सोडून दिले होते का?, असा देखील प्रश्न उपस्थीत होते आहे. मंत्री अनिल पाटील आणि शिरीष चौधरी या दोघांमध्ये पुन्हा एकदा सरळ लढत होत असल्यामुळे ही 'काटे की टक्कर' मानली जात आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघासह उमेदवारांची थोडक्यात माहिती !
अमळनेरात १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. चार जणांनी माघार घेतली आहे. आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तीन पक्षांचे तर नऊ अपक्ष उमेदवार आहेत. यात कॉग्रेसकडून डॉ. अनिल नथू शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटकडून अनिल भाईदास पाटील, तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी उमेदवार रिंगणात आहेत. येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाची वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास साने गुरुजी यांची कर्मभूमी तर कापूस उत्पादक शेतकऱ्याचा मतदारसंघ,मराठा समाजाचा प्रभाव असला तरी मुस्लीम आणि दलित समाजाचे मोठे मतदान या मतदार संघात आहे.
