नगराध्यक्षपदासाठी रिंगणात कोण?
तांबे घराण्याकडून पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना ‘संगमनेर सेवा समिती’ पॅनलकडून उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ या शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडून मैदानात उतरल्या. दोन्ही बाजूंनी प्रभावी राजकीय कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला.
वाघ-सिंहाची लढत
advertisement
संपूर्ण प्रचारकाळात संगमनेरमध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा रंगल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांची प्रचारसभा जितकी गाजली, तितकीच दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या सभा जोशात पार पडल्या. स्थानिक पातळीपासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत सर्वांचे लक्ष वाघ–सिंहच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे होते.
शिंदेंकडून आश्वासनांचा पाऊस
प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोरात कुटुंबावर जोरदार टीका केली. गेली 40 वर्षे नगरपरिषद ही काहींच्या राजकारणाचा अड्डा बनली होती. विकास रोखून सत्तेचा मिदा खात बसलेल्यांना यावेळी जनता धडा शिकवेल. तसेच त्यांनी 2010 पासून महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर शिंदे यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये संगमनेर एमआयडीसी मंजुरीची प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करणे.बंद पडलेल्या कॉटेज हॉस्पिटलच्या जागेवर महिला व बालकांसाठी रुग्णालय उभारणे.बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा उपलब्ध करणे.पुणे–नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरमार्गे नेण्यासाठी केंद्रात पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करणे. तसेच शहरातील वाढत्या ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
थोरातांची जोरदार टीका
एकनाथ शिंदेंच्या आश्वासनांना बाळासाहेब थोरात यांनीही तितक्याच जोरदार पद्धतीने उत्तर दिले. थोरातांनी सभेतच शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना केलेल्या फोनची नक्कल करीत टीका केली. ते म्हणाले, ''हे जिथे जातील तिथे एमआयडीसी मंजूर करतात. लोक म्हणतात पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. धरणाला नदी नाही म्हणाले की नदी मंजूर.नदीला पाणी नाही म्हणाले की डोंगर मंजूर. निवडणुकीत फसवे आश्वासने देण्याची यांना सवय झाली आहे. पण आता जनता जागी झाली आहे, ही बनवाबनवी चालणार नाही.” असा टोला थोरातांनी शिंदेंना लगावला होता.
