मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना काकाजी असे संबोधले आहे. फडणवीस काकांनी सध्या मराठ्यांसोबत जुळवून घेतलंय जे समाजाचं चांगलं करत असतील आम्ही त्याच्यासोबत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल पडणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
आम्ही वर्षावर गुलाल उधळणार : मनोज जरांगे
advertisement
मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस काकांनी मराठ्यांसोबत जुळवून घेतले आहे. त्यांनी आता हैदराबाद गॅझेटचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आमचं भलं केलं आम्ही त्यांचं कौतुक करू त्यांच्यासोबत राहणार आहे. आम्ही वर्षावर आणि त्यांच्यावरही गुलाल उधळणार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल उधळणार आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, आम्ही गुलाल उधळणार आहे. त्यांनी आमचा प्रश्न सोडवला मग आम्ही त्यांचं कौतुक करणारच आहे.
आझाद मैदानावरील आंदोलनानंतर कौतुक
अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी होती. त्यांच्या आदेशामुळेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. तेव्हापासून जरांगे हे सातत्याने फडणवीसांवर टीका करत आहे. मात्र आझाद मैदानावरील आंदोलनानंतर जरांगे फडणवीसांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.