काय म्हणाले भागवत कराड?
भाजपचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अर्थसंकल्पाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यांनतर ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कराड यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यामध्ये ते म्हणाले," ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं असून हे टिकणार आरक्षण आहे." असं भागवत कराड म्हणाले.
advertisement
भागवत कराड यांनी केलेल्या या विधानामुळे निश्चितच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचीच भाजपची भूमिका असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मराठ्यांना दिलेलं 10 टक्के आरक्षण कोर्टात टीकवण्यावर राज्य सरकारचा भर असेल असंच चित्र सध्यातरी दिसत आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी समाज देखील आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून सरकारला आव्हान देत आहे. भाजपचे नेते या नात्याने भागवत कराड यांच्या विधानाला महत्व आहे.
Nitin Gadkari: असं ट्राफिक मॅनेजमेंट राज्यात प्रथमच होणार, नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन
मनोज जरांगे मागणीवर ठाम:
मराठा समाजाला टीकणारं 10 टक्के आरक्षण दिलं, अशी भूमिका सातत्याने सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मांडली जात आहे. असं असलं तरी मनोज जरांगे पर्यायाने मराठा समाज ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळावं, या मागणीवर सातत्याने ठाम असल्याचं दिसत आहे. शिवाय सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करत तात्काळ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळावेत, ही देखील मनोज जरांगेंची प्रमुख मागणी आहे.
तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते आरक्षण बचाव यात्रा काढत सरकारने दबावात येत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये, अशी मागणी सातत्याने करताना दिसत आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं चिघळण्याची शक्यता आहे.
