सोलापूर ते मुंबई या प्रवासासाठी सामान्यतः 3500 ते 5000 रुपये भाडे आकारले जाते. मात्र, 19 ते 22 मार्च दरम्यान सलग सुट्ट्या येत असल्याने प्रवाशांनी विमान प्रवासाला पसंती दिली आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत खाजगी विमान कंपन्यांच्या 'डायनॅमिक फेअर'मुळे हे दर 12 ते 18 पटीने वाढले आहेत. रविवारच्या फ्लाईटसाठी शेवटचे एक तिकीट तब्बल 43 हजारांना विकले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर सोलापूर-गोवा विमान प्रवासाचे दरही 18 हजार रुपयांच्या पार गेले आहेत.
advertisement
सर्व फ्लाईट्स 'हाऊसफुल्ल'
19 मार्च ते 22 मार्च या कालावधीत गुढीपाडवा, साप्ताहिक सुट्ट्या आणि पर्यटन यामुळे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर दर्शनासाठी येणारे भाविक आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी विमानाची सर्व 60 आसने आधीच बुक केली आहेत. महागड्या तिकिटांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असली, तरी वेळेची बचत करण्यासाठी सधन वर्ग या दरांकडे दुर्लक्ष करून प्रवास करत आहे.
वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांची विमानाला पसंती
सध्या लग्नसराईचे मोठे मुहूर्त असल्याने अनेक कुटुंबे प्रवासासाठी विमानाचा आधार घेत आहेत. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नसल्याने आणि रस्ते मार्गांमुळे होणारा वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी विमानाला पसंती दिली आहे. मात्र, विमान तिकिटांच्या या लुटमारीवर नियंत्रण असावे, अशी मागणी आता सोलापूरच्या प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
