मुंबई महापालिकेत सध्या भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ असे एकूण ११८ नगरसेवक महायुतीकडे आहेत. नियमानुसार बहुमतासाठी लागणारा आकडा महायुतीकडे असला तरी सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात मतभेद असल्याची माहिती आहे. शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे यांनी यापूर्वीच कोकण भवनात जाऊन आपली अधिकृत गटनोंदणी केली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्याप आपली अधिकृत गटनोंदणी केलेली नाही. महापौर पदाच्या निवडीसाठी ही नोंदणी अनिवार्य असते. असं असूनही अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्याचं दिसत आहे.
advertisement
महापौर पदावरून रस्सीखेच
महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी (महिला) आरक्षित झाल्याने भाजपमधून अनेक मातब्बर नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला शिवसेनेने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. शिवसेनेचे हे 'मौन' आणि भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महापौरपदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. मात्र, रात्री उशिरा वरिष्ठ पातळीवर झालेल्या राजकीय खलबतांनंतर ही निवडणूक नियोजित तारखेला न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्याप महापौर कोणाचा, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. शिवाय दोन्ही पक्षांनी गटनोंदणी देखील केलेली नाही. अशात महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख अचानक चेंज केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
