बीडच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात फक्त ८० रोपं लावली, अन् वर्षाला करतोय १२ लाखांची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : बदलत्या काळात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आता नगदी आणि कमी जोखमीच्या पिकांकडे वळताना दिसत आहेत.
मुंबई : बदलत्या काळात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आता नगदी आणि कमी जोखमीच्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. केवळ पारंपारिक शेतकरीच नव्हे, तर सुशिक्षित तरुणही शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान आणि पाण्याची टंचाई यामुळे शेती करणे अधिक आव्हानात्मक बनले असले, तरी योग्य पीक निवड आणि नियोजन केल्यास शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट होत आहे.
प्रयोग केला यशस्वी ठरला
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील दत्तात्रेय घुले यांनी अशाच प्रकारे पारंपारिक शेतीचा मार्ग सोडून वेगळा विचार केला. दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावात राहणाऱ्या दत्तात्रेय घुले यांनी खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. हवामानातील टोकाचे बदल, कधी अतिवृष्टी तर कधी तीव्र दुष्काळ, यामुळे नेहमीची पिके वारंवार हातची जात होती. या परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी त्यांनी पर्यायी पिकांचा अभ्यास केला आणि खजूर लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
८० रोपं लावली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दत्तात्रेय घुले यांनी अवघ्या दीड एकर क्षेत्रात सुमारे ८० खजूराची झाडे लावली आहेत. या लागवडीमधून त्यांना दरवर्षी अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे खजूर हे पीक तुलनेने कमी पाण्यावर चांगले उत्पादन देते, त्यामुळे दुष्काळी भागासाठी ते अधिक उपयुक्त ठरत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरीही खजूर लागवडीकडे आकर्षित होत आहेत.
advertisement
झाडामागे १५ ते २० हजारांची कमाई
दत्तात्रेय घुले यांनी बीड जिल्ह्यात बार्ली जातीच्या खजूराची लागवड केली आहे. ही जात दर्जेदार उत्पादनासाठी ओळखली जाते. खजूर लागवड करताना दोन झाडांमधील अंतर साधारण २५ x २५ फूट ठेवले जाते. एका एकरात सुमारे ६५ झाडे लावता येतात. योग्य देखभाल केल्यास प्रत्येक झाडापासून १८० ते २०० किलोपर्यंत फळे मिळू शकतात. बाजारात या खजुराला चांगली मागणी असल्याने एका झाडामागे सुमारे १५ ते २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे कमी क्षेत्रातही शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
advertisement
दरम्यान, या लागवडीसमोर काही अडचणीही आहेत. बार्ली जातीच्या खजूराच्या एका रोपाची किंमत सुमारे ४ ते ४.५ हजार रुपयांपर्यंत जाते. ही किंमत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी परवडणारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केली आहे. दत्तात्रेय घुले यांच्या मते, गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये खजूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना रोपांवर अनुदान दिले जाते. तशीच सुविधा महाराष्ट्रातही मिळाल्यास अनेक शेतकरी या पिकाकडे वळू शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 7:23 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
बीडच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात फक्त ८० रोपं लावली, अन् वर्षाला करतोय १२ लाखांची कमाई








