नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे आई-वडील मोलमजुरीचे काम करतात. कामाच्या निमित्ताने त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत मुलगा काही चुकीच्या सवयींकडे वळला होता, चुकीचं वागत होता. त्याला समजावून सांगितलं तरी ऐकत नव्हता, असा दावा आई-वडिलांनी केला आहे. मुलाला वठणीवर आणण्यासाठी त्यांनी चक्क त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा अघोरी मार्ग निवडला. गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून हा क्रूर प्रकार सुरू होता. आई-वडील कामावर जाताना मुलाच्या पायाला साखळदंड बांधून त्याला कुलूप लावलं जात होतं. आई वडील कामावरून परतल्यावर त्याला मोकळं केलं जात होतं.
advertisement
पायाला जखमा आणि चाईल्ड हेल्पलाईनची कारवाई
दीर्घकाळ साखळदंडाने बांधून ठेवल्यामुळे त्या लहान मुलाच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. या अमानवीय वागणुकीची माहिती 'चाईल्ड हेल्पलाईन'ला मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या घटनास्थळी धाव घेतली. तिथे मुलाची अवस्था पाहून पथकही हादरून गेले. पोलिसांनी मुलाची सुटका केली.
पोलीस कारवाई आणि समुपदेशन
या प्रकरणी अजनी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाला सध्या बालगृहात हलवण्यात आले असून, तिथे त्याच्यावर उपचार आणि समुपदेशन सुरू आहे. शिस्तीच्या नावाखाली पोटच्या मुलाला अशा प्रकारे साखळदंडाने बांधून ठेवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
