तांदूळ तस्करी आणि वर्चस्व वादातून खून
ऑगस्ट २०२५ मध्ये यशोधरा नगर उड्डाणपुलाजवळ समशेर खान (३०) उर्फ समीर येडा याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तांदळाच्या तस्करीतून निर्माण झालेला वाद आणि टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून 'अस्सू टोळीने' हा खून केला होता. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र भव्य यादव फरार होता.
advertisement
पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा
आरोपी भव्य यादव हा मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने परराज्यात पळून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेशटेकडी मंदिर रस्त्यावरील बसस्थानक परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली. तो बसस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.
या पथकाने केली कारवाई
ही धाडसी कारवाई विशेष पथकाचे हवालदार श्याम कडू, कुणाल कोरचे तसेच यशोधरानगर पोलीस ठाण्याचे राहुल बोंद्रे, सितेश चौरसिया आणि विकास बेंद्रे यांच्या पथकाने केली. गेल्या चार महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.
गुन्हेगारी विश्वात खळबळ
समीर येडा याच्या हत्येनंतर नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता मुख्य मारेकरी जेरबंद झाल्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता या हत्येमागे आणखी कुणाचा हात होता का? याचा अधिक तपास करत आहे.
