गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली. हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवसापासून आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.
advertisement
आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा...
नागपूर दंगलीमधील आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोपींविरोधात नागपूर दंगल प्रकरणात आरोपी फहिम खान आणि इतर आरोपींवर BNS 152 अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे ते 172 व्हिडीओ सायबर पोलीसांच्या हाती लागले आहेत. CCTV आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
आरोपी दंगलग्रस्त भागाबाहेरील....
नागपूरच्या हिंसाचारामध्ये नावानिशी आरोपी करण्यात आलेल्या 51 लोकांमध्ये बहुतांशी लोक दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली त्या भालदारपुरा, चिटणीसपार्क, महाल, हंसापुरी या प्रभावित वस्त्यांच्या बाहेरचे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआर मध्ये ज्या 51 आरोपींची नावं आणि त्यांचे पत्ते देण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास 24 आरोपी हे दंगल सदृश स्थिती निर्माण झाली त्या प्रभावित क्षेत्राचे रहिवाशी नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
अटकेतील काही आरोपी घटनास्थळी पासून लांब असलेल्या कळमना, पारडी, उमरेड रोड, वाठोडा, यशोधरा नगर, टेकनाका, जाफर नगर, बंगाली पंजा, ताजबाग या भागातील असल्याचे तपासात समोर आलं आहे. त्यामुळे महाल आणि परिसराला अशांत करणारे, हिंसा घडवणारे त्या भागातील स्थानिक कमी आणि बाहेरील लोक जास्त संख्येत होते या आरोपांना बळ देणारी माहिती समोर आली आहे. आता, हिंसाचाराच्या पूर्वी अगदी संध्याकाळच्या वेळेस हे सर्व लोक त्या ठिकाणी का आणि कोणत्या उद्दिष्टाने पोहोचले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
