नगरपालिकेच्या पाणी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 20 ऑगस्ट रात्री 10 वाजेपर्यंत हा पुरवठा बंद राहील. या कालावधीत 24 जलकुंभांशी जोडलेल्या परिसरात पाणी उपलब्ध होणार नाही.
या भागाचा पाणीपुरवठा बंद
यात प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, टाकळी, जयताळा, त्रीमुर्तीनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. नागपूरच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येला या पाणीबंदीचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आगाऊ नियोजन करून पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, या काळात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, पाण्याचा दाब कमी करून पुरवठा करण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी टँकर किंवा पर्यायी स्रोतांचा वापर करून व्यवस्थापन करावे लागणार आहे. महापालिका प्रशासनाने शक्य तेथे टँकरद्वारे पुरवठा करण्याचे नियोजन केले असले तरी तो मर्यादित स्वरूपात राहणार आहे.
पावसाळ्याच्या काळात जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी आणि गळतीचे प्रमाण वाढते. याच पार्श्वभूमीवर देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या कामामुळे पुढील काळात पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी 19 ऑगस्टपूर्वी आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवणे, पाणी वापरात काटकसर करणे आणि अपव्यय टाळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की या 36तासांच्या पाणीबंदीदरम्यान संयम ठेवावा आणि सहकार्य करावे.
