नेमकं प्रकरण काय?
मिताली आणि सुनील (नावे बदललेली आहेत) हे दोघंही सुशिक्षित असून त्यांचा विवाह नाशिकमध्ये झाला होता. सुनील पुण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. लग्नानंतर हे दाम्पत्य पुण्यात एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होतं. त्यांना पाच वर्षांच्या संसारात एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन गोंडस अपत्ये झाली. मात्र, मुलं जशी जशी मोठी होऊ लागली, तसे त्यांचे चेहरे बदलू लागली. ते पतीसारखी दिसत नव्हती. यावरून दाम्पत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली.
advertisement
नणंद आणि सासरच्यांचा जाच
सुनीलची बहीणही पुण्यातच राहते. ती अधून मधून आपल्या भावाला आणि वहिनीला भेटायला येत असे. या वादाची ठिणगी सुनीलच्या बहिणीने (नणंद) टाकली. "मुलं माझ्या भावासारखी दिसत नाहीत," असे म्हणत तिने मितालीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. हळूहळू सासू-सासऱ्यांनीही हाच सूर आळवला. एकेदिवशी मिताली एकदा भाजी आणायला घराबाहेर गेली असता, सासू-सासऱ्यांनी घराला बाहेरून कुलूप लावून गावी पळ काढला. जेव्हा मितालीने पती सुनीलला फोन केला, तेव्हा त्यानेही मदतीऐवजी "मुलं माझ्यासारखी दिसत नाहीत, तुझं तू बघून घे" असं म्हणत तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
DNA चाचणीने सत्य समोर, पण...
मितालीने हार न मानता आपले चारित्र्य सिद्ध करण्यासाठी स्वतःहून DNA टेस्ट करण्याचा आग्रह धरला. नातेवाईकांच्या उपस्थितीत सुनील आणि दोन्ही मुलांची DNA चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला, म्हणजेच दोन्ही मुले सुनीलचीच असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले. मात्र, तरीही सुनीलच्या मनात संशयाचं भूत होतं. त्याने पत्नी आणि मुलांना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
या प्रकरणी पीडित विवाहितेनं पोलीस ठाण्यात जाऊन पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. हे प्रकरण सध्या कोर्टात पोहोचलं असून याबाबतचा खटला सुरू आहे.
