दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदाघाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जलस्त्रोत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे ते जलस्त्रोत खाली दबत गेले आहे. काही डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून देवांग यांनी जुन्या भाजीमंडईमध्ये तीन जुन्या विहीरी असल्याचा खुलासा केला आहे. याबद्दलचे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले आहे. त्यांनी दैनिक भास्करसोबत साधलेल्या संवादामध्ये गोदाघाटवरील रहस्याबद्दल भाष्य केले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गोदाघाट परिसरामध्ये सध्या अनेक विकासकामांचा धडाका सध्या सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदकामाचे काम सुरू आहे. गोदाघाटच्या भाजी मंडईमध्ये सध्या खोदण्याचे काम सुरू आहे. तिथे काम सुरू असताना एका ठिकाणी सतत पाणी येत होतं, त्यामुळे मोटर पंपच्या माध्यमातून ते पाणी काढण्याचं काम सुरू होतं. इतकं केलं तरीही पाण्याचा फ्लो कायम तसाच सुरू राहिला. देवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबादमधील एका सॅटेलाईट कंपनीच्या मदतीने 7 ते 8 महिन्यापूर्वी सॅटेलाईटच्या आधारे रिमोट सेंसिंग इमेजच्या माध्यमातून तीन विहीरी असल्याचे निदर्शनात आले होते.
त्या विहीरी काँक्रिटीकरणामुळे खाली दबल्या गेल्या होत्या. हे जुने पाण्याचे स्त्रोत वाढती लोकसंख्या लक्षात घेता बुजवण्यात आले होते. पण सध्या सुरू असलेल्या कामामुळे त्या ठिकाणी तीन विहीरी असल्याचे निदर्शनात आले होते. सलग सुरू असलेला पाण्याचा फ्लो पाहता तिथे काही तरी असल्याचे लक्षात आले. कुंभमेळा प्राधिकरण, विभागीय आयुक्त आणि मनपा प्रशासनाने त्या परिसरामध्ये सॅटेलाईटच्या आधारे रिमोट सेंसिंग इमेजच्या माध्यमातून तिथे विहीर असल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, तिथे जवळपास गोदावरी नदी असल्यामुळे तिच्या पात्रातील पाणी पुढे जात असल्याचीही शक्यता आहे. नदीला पाण्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे तिथेही पाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते.
सामाजिक कार्यकर्ता देवांग जानी यांनी प्रतिक्रिया दिली की, "गोदाघाट परिसरामध्ये आणि गोदा नदीच्या पात्राच्या परिसरामध्ये वारंवार काँक्रिटिकरण होत असल्यामुळे हे पात्र बुजलं होतं. पण खोदकाम केल्यामुळे या परिसरामध्ये विहीर असल्याचे स्पष्ट झाले. नदीला काँक्रिटमुक्त करत तिचा स्त्रोत कायमच ठेवण्याचा मुद्दा आपला असणार आहे. त्याला संरक्षित करण्याचा आपला सर्वांचा मानस असेल. गोदावरी नदीला जिवंत ठेवण्याचा सर्वांचंच काम आहे आणि आपण ते सर्व एकत्र येऊन करूयात."
