भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. खरातकडे अनेक बड्या नेत्यांची गुपितं असून ती बाहेर पडू नयेत यासाठी येत्या दोन दिवसांत त्याचा 'एन्काऊंटर' केला जाऊ शकतो, असा थेट दावा देसाई यांनी केला आहे. देसाई यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. तृप्ती देसाई यांनी एक व्हिडीओ जारी करत हा दावा केला.
advertisement
तृप्ती देसाईंनी नेमका दावा काय केला?
तृप्ती देसाई म्हणाल्या, "अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचं पद गेलं. माझी सुनेत्रा पवारांना विनंती आहे की, त्यांनी चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील हकालपट्टी करावी. अशोक खरातचे अनेक मंत्र्यांशी आणि राजकारण्यांशी संबंध आहेत. त्यामुळे अनेकांचं पितळ उघड होऊ शकतं. अनेक मंत्र्यांचे संबंध पुढे येऊ शकतात. म्हणून कदाचित अशोक खरातला संपवण्याचा डावही होऊ शकतो."
"अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो"
तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, "काल मला नाशिकमधून एका पीडित नातेवाईकाचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की, २४ तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र २४ तारखेला खरातला कोर्टात घेऊन जाताना झटापटीत अशोख खरातला मारलं गेलं, अशा पद्धतीचा एन्काऊंटर होऊ शकतो, हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा डाव आहे."
"एन्काऊंटरचा कट उधळून लावला पाहिजे"
"त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, अशोक खरातने बरेच कांड केले आहेत. अनेकांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्यामुळे त्याला तातडीने संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवशी शिक्षा मिळाली पाहिजे, त्यामुळे अशाप्रकारे खरातला मारायचा डाव असेल, तर तो उधळून लावला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे," असंही तृप्ती देसाई बोलल्या.
