न्यूज एटीन मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत देशातल्या दीडशे जिल्ह्यात हिंसक चळवळ चालवणाऱ्या माओवादी संघटनेचा प्रवास कसा होता, या संघटनेला सुरक्षा दलांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी भू सुरंग स्फोटकं आणि इतर लढण्याचं तंत्र एलटीटीमधून बाहेर पडलेल्या काही सहकाऱ्यांनी विशेष प्रशिक्षण दिल्यामुळेच सुरक्षा दलाच्या विरोधात सशस्त्र लढयाला कसं यश आलं? याची माहितीही वेणुगोपाल उर्फ भूपतीने दिली आहे.
advertisement
...तर तो आज जिवंत राहिला असता
गेल्याच वर्षी माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता भाकप माओवादी संघटनेचा महासचिव बसवराजू याच्या संमतीनेच संघटनेने शस्त्रे सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र हा निर्णय अमलात येण्यापूर्वीच बसवराज चकमकीत ठार झाला. हिडमा माझा हा आवडता सहकारी होता. आत्मसमर्पण केलं असतं तर तो आज जिवंत राहिला असता, अशी हळहळ व्यक्त करत माओवादी संघटना अनेक विषयात चुकीच्या पद्धतीने वागल्यानेच संघटनेला हादरा बसला, अशी कबुलीही भूपतीने दिली.
माओवाद्यांच्या सर्वोच्च मार्गदर्शकासोबत शेवटची बैठक कधी?
तब्बल 40 वर्षे कुटुंबीयापासून दूर राहिलो असून जंगलातल्या आदिवासींनी माझ्यावर प्रेम केले. त्यामुळे आदिवासी भाग हा माझा आवडता क्षेत्र आहे. असे सांगत शस्त्र सोडून मूळ प्रवाहात परत येण्याची वाटचाल भूपतीने न्यूज 18 मराठीशी बोलताना उलगडून दाखवली. माओवाद्यांचा सर्वोच्च मार्गदर्शक नेता गणपती याच्यासोबत 2024 मध्ये शेवटची भेट झाल्याचे सांगत केंद्र समितीच्या काही सदस्यांसोबतची ती शेवटची बैठक होती, अशी माहितीही भूपतीने दिली.
माओवाद्यांचं सगळ्यात मोठं अधिवेशन जंगलात कसं पार पडलं?
गडचिरोली जिल्ह्यात 1980 च्या काळात वनविभागाने मोठ्या प्रमाणात आदिवासींवर अत्याचार केले. त्यामुळेच अनेकांनी संघटनेत प्रवेश केला आणि आमची संघटना या भागात वाढली, असे सांगत 1984 मध्ये देशातलं माओवाद्यांचं सगळ्यात मोठं अधिवेशन कसं पार पडलं याची माहितीही भूपतीने दिली. पश्चिम बंगालच्या चकमकीत ठार झालेला मोठा भाऊ किशनजी सुरुवातीपासूनच त्यांच्या संघटनेचे नेतृत्व करत असल्याने त्याच्या मार्गदर्शनातच माओवादी संघटनेची वाट धरली असेही भूपतीने सांगितले.
जिवंत राहायचे असेल तर आत्मसमर्पण करा, सहकाऱ्यांना आवाहन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत नक्कीच माओवादी संघटना संपुष्टात येण्याची शक्यता दिसत असल्याचाही भूपतीने मान्य केले. जिवंत राहण्यासाठी शस्त्र सोडणे आवश्यक असून संघटनेत सक्रीय असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहनही भूपतीने केले.
