कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली, पण काही तासांमध्येच काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना तिकीट दिलं.
मधुरिमाराजे यांनी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्जही दाखल केला, पण अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. मधुरिमाराजे यांच्या या भूमिकेमुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचं पंजा चिन्ह गायब झालं, त्यामुळे काँग्रेसला अपक्ष रिंगणात उतरलेल्या राजेश लाटकर यांना पाठिंबा द्यावा लागला. मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं रौद्ररुप महाराष्ट्राने बघितलं होतं.
advertisement
कोल्हापूर उत्तरमध्ये नवा ट्वीस्ट
कोल्हापूर उत्तरचा हा वाद संपत नाही तोच पुन्हा एक नवा ट्वीस्ट आला आहे. मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांचे बंधू विश्वविजय खानविलकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे. विश्वविजय खानविलकर हे माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे सुपूत्र तसंच मधुरिमाराजे यांचे कनिष्ठ बंधू आहेत. खानविलकर गटाने फक्त राजेश क्षीरसागर यांनाच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे.
