वसई विरार मध्ये पाकिस्तान पाठोपाठ आता नेपाळ येथील सीमेलगत भागातूनही अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नुकताच वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ३७ लाख ५१ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
बॉर्डरवरून कशी व्हायची तस्करी?
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबरला वसई पूर्वेकडील खैरपाडा येथे एक इसम राहत्या घरातून चरस अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी पथक तयार करून छापा टाकून इरफान सुलेमान खत्री (७०) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तब्बल १ किलो ८८ ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १६ लाख ३७ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला.
advertisement
याच दरम्यान मुख्य आरोपी तबरेज अमीन मियान खान (२५) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ हजार ३८६ ग्रॅम वजनाचा चरस आणि १ हजार ५० ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ३७ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांच्या तस्करी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व अमली पदार्थ पाकिस्तानसह नेपाळ बॉर्डरवरून भारतात आणली जात होती.
नेमकं रॅकेट कसं चालायचं?
अटक करण्यात आलेला तबरेज खान हा मूळचा बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील आमदोई या गावातील आहे. नेपाळची सीमा त्याच्या गावापासून अगदी काही अंतरावर आहे. तेथील ओळखीच्या तस्करांच्या माध्यमातून नेपाळमध्ये जाऊन चरस आणि गांजा खरेदी करत होता. व त्यानंतर कपड्याच्या बॅगेत भरून रेल्वे मार्गाने भिवंडीत घेऊन येत असल्याचे तपासात समोर आले आहे.