संघर्षातून मिळाली व्यवसायाची प्रेरणा
नेहा यांचे बालपण नाशिकमध्ये गेले. मात्र, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्याने त्यांना मुंबई गाठावी लागली. शिक्षण आणि घराचा खर्च पेलण्यासाठी त्यांनी मुंबईत नोकरी सुरू केली. मात्र, नोकरीच्या मर्यादित पगारात आपली मोठी स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, याची जाणीव त्यांना झाली. याच प्रेरणेतून त्यांनी धाकट्या बहिणीच्या मदतीने मुंबईचे लाईफलाईन असलेल्या वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
Success Story : शेतकऱ्यानं धाडसं दाखवलं, सव्वा एकरमध्ये केली घेवडा शेती, वर्षाला 3 लाख कमाई
संकटावर मात आणि नाशिकमध्ये पुनरागमन
मुंबईत व्यवसाय स्थिरावत असतानाच कोरोना महामारीचे संकट आले आणि त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. दरम्यानच्या काळात नाशिकमधील तरुणाशी विवाह झाल्यानंतर नेहा पुन्हा आपल्या मूळ शहरात परतल्या. मुंबईतील व्यवसायाचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी पुन्हा नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. पती आणि सासरच्या मंडळींच्या भक्कम पाठिंब्यावर त्यांनी नाशिकमध्ये ऋग्वेद मुंबईचा वडापाव या नावाने स्वतःचा ब्रँड लाँच केला.
आज देतायत इतरांना रोजगार
एकेकाळी नोकरीसाठी धडपडणाऱ्या नेहा आज यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या व्यवसायाने नाशिककरांच्या जिभेवर चांगलीच चव रेंगाळली असून, हा वडापाव शहरात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. केवळ स्वतःची प्रगती न थांबवता, त्यांनी आज इतर काही व्यक्तींनाही रोजगार दिला आहे. संकटं कितीही आली आणि अडचणी वाढल्या तरी हार मानायची नाही, हे मी पक्कं ठरवलं होतं, असे नेहा अभिमानाने सांगतात.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नेहा गोसावी यांची ही यशोगाथा आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.