गेल्या काही तासांपासून राहुरी पोटनिवडणुकीत निर्माण झालेला 'सस्पेन्स' अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, भाजप नेत्यांच्या विनंतीवरून आणि मतदारसंघाच्या विकासाच्या आश्वासनानंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे संकेत त्यांनी दिले.
भाजप नेत्यांची थेट तनपुरेंच्या कार्यालयात धाव
advertisement
भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून, ही जागा अक्षय कर्डिले यांच्यासाठी बिनविरोध सोडावी, अशी विनंती या दोन्ही नेत्यांनी तनपुरे यांना केली.
विकासाच्या मुद्द्यांवरून घेतली माघार
भाजप नेत्यांसोबत झालेल्या भेटीनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले की, ते मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी म्हटले की, "मी विकासाच्या मुद्द्यावर ठाम होतो. के के रेंजजवळील ७ हजार एकर जमिनीचे अॅम्युनिटी पार्कसाठी होणारे अधिग्रहण रद्द करावे, हा माझा मुख्य मुद्दा होता. त्यावर नेत्यांनी असं कोणतंही अधिग्रहण होणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे," असे तनपुरे यांनी सांगितले. याशिवाय साखर कारखान्याचा एनसीडीसी (NCDC) मधील प्रलंबित विषय, नगरपरिषदेचा निधी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी प्रकल्प आणणे या अटीही त्यांनी भाजप नेत्यांसमोर मांडल्या आहेत.
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर काय म्हणाले?
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर तनपुरे यांनी स्पष्टपणे भाष्य केले. "मला जर भाजपमध्ये जायचं असतं तर मी खूप आधीच गेलो असतो. स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला शरद पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी दिले होते," असे त्यांनी स्पष्ट केले.
