भिवंडी: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भिवंडी कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाविरोधात केलेल्या विधानावरून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी उद्या शनिवारी सुनावणी होणार आहे, त्यासाठी राहुल गांधींना हजर राहावे लागणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांना शनिवारी जामिनासाठी भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी गेली ९ वर्षे सुरू असून या प्रकरणात राहुल गांधी यांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता. मात्र, त्यावेळी जामीनदार असलेले शिवराज पाटील यांचं निधन झाल्यामुळे आता त्यांना नव्याने जामीनदार सादर करावा लागणार आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
शनिवारी भिवंडी न्यायालयात येत असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आरोपी राहुल गांधी यांनी सोनाळे गावात निवडणूक सभेत महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचं विधान केलं होतं. संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी संघाच्या बदनामी झाल्याबद्दल भा. दं. सं. कलम 500 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात फिर्यादीची तपासणी आणि उलटतपणी झालेली आहे. त्यानंतर सदर प्रकरणची चौकशी करणारे पोलीस अधिकारी सायकर यांची सरतपासणी नोंदविलेली आहे.
राहुल गांधी का होताय हजर?
तसंच, सदर केसमध्ये राहुल गांधी यांना जामीन देणारे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यानं त्यांच्या जागी नवीन जामीन देण्यासाठी राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात येत असल्याची माहिती राहुल गांधी यांच्या वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना आतापर्यंत तीन वेळा भिवंडी न्यायालयात हजर रहावे लागले आहे. दरम्यान, उद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या सुरक्षेचा विचार करून न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
