दौंडच्या एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्म
रूपाली चाकणकर यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मात्र, महिला सुरक्षेसाठी काम करायच्या या पदावर असताना त्यांच्या काही निर्णयांमुळे आणि वक्तव्यांमुळे त्यांच्यावर सर्वपक्षीय टीका झाली आणि अनेकदा त्यांच्या राजीनाम्याच्या मागण्याही झाल्या.
जन्म, शिक्षण आणि राजकारणात प्रवेश
रूपाली चाकणकर यांचा जन्म दौंडमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात शिक्षण घेतले. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचाही राजकारणात प्रवेश झाला.
advertisement
महापालिका निवडणुकीत पराभव (२०१२)
२०१२ च्या पुणे महापालिका निवडणुकीत रूपाली चाकणकर यांचा युगंधरा चाकणकर यांनी पराभव केला. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदापर्यंत त्यांची नियुक्ती
महिला प्रदेशाध्यक्षपद (२०१९)
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रूपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
महिला आयोगाच्या अध्यक्षा (२०२१ पासून)
ऑक्टोबर २०२१ मध्ये रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. त्यांची पुनर्नियुक्ती होऊन त्या २०२७ पर्यंत या महत्त्वाच्या पदावर कायम राहिल्या असत्या. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत.
महिला सुरक्षेसाठी काम करणाऱ्या आयोगाच्या प्रमुख असूनही रूपाली चाकणकर वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यांच्याविरोधात राजीनाम्याच्या मागण्या अनेक वेळा झाल्या.
अशोक खरात (भोंदूबाबा) प्रकरण (मार्च २०२६)
नाशिकचे भोंदूबाबा प्रकरण सर्वाधिक गाजते आहे. नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात याने गुंगीचे औषध देऊन महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले. या प्रकरणात रूपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याशिवाय त्या खरातच्या ट्रस्टवर सदस्य असल्याचेही उघड झाले. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षच ट्रस्टवर असल्याने खरातची हिंमत वाढल्याचा आरोप करण्यात आला.
संभाजीराजे भोसले यांनी मागणी केली की जर चाकणकर स्वतःहून राजीनामा देणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासासाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली.
एका स्थानिक पत्रकाराने भोंदूबाबाचे काळे सत्य जगासमोर आणल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी संबंधिताला फोन करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पीडितांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी आरोपीच्या बचावाचा आरोप चाकणकर यांच्यावर आहे.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण (नोव्हेंबर २०२५)
फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याच्या आरोप आहे. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीने अजित पवार गटाच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील धायरी परिसरातील चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आणि राजीनाम्याची मागणी केली होती.
बीड महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण (२०२५)
बीडमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातही चाकणकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे काही तरुणांनी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन केले आणि राजीनाम्याची मागणी केली. महिलांच्या संवेदनशील प्रश्नांवर त्यांच्या वक्तव्यांनी वेळोवेळी वाद निर्माण केला.
