नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात खरातची गुरूवारी दोन तास कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते. दरम्यान अशोक खरात याची चौकशी सुरू असताना चाकणकर यांच्यावर राजीनाम्याचा वाढता दबाव होता. त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
advertisement
रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलंय?
मी रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. धन्यवाद...!
