राष्ट्रवादीत फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना मोठा फटका बसला. अनेक जागांवर उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीत सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का बसला. यासंदर्भात अजित पवार त्यांच्या भाषणात बोलले. पराभवाने खचून जायचं नसतं आणि यश मिळाल्यावर हुरळून जायचं नसतं. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा कामाला लागले. आम्हीही विचार केला आणि लोकसभेला कमी का पडलो याचा विचार केला असंही अजित पवार म्हणाले.
advertisement
विरोधकांकडून फेक नरेटिव्ह सेट करण्यात आल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. लोकसभेवेळी पाण्याचा दुर्भिक्ष्य होतं. उन्हाळा होता. आता पाऊस झालाय. धरणं भरली आहेत.विहिरींना चांगलं पाणी आहे. लोकसभेला संविधान बदलणार असं पसरवण्यात आलं. घटना बदलायचीय असा खोटा प्रचार केला गेला आणि तो मागासवर्गीयांना खरा वाटल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
फेक नरेटिव्हवर बोलताना अजित पवार म्हणाले की, कुठून कुठून कल्पना काढल्या काय माहिती. पण आमची वाटच लावली. बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली.साताऱ्यात पिपाणीने वाचवलं. लोकांना पिपाणी तुतारीसारखी दिसली. ३५ ते ४० हजार मतं पिपाणीला गेली. आमचा राजा वाचला. १३ वे वंशज वाचले. त्यामुळे आमची थोडीफार इज्जत वाचली.
लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे ३२ हजार ७७१ मतांनी जिंकले होते. या मतदारसंघात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली होती. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर संजय गाडे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांचं निवडणूक चिन्ह पिपाणी होतं. त्यांना ३७ हजार ६२ मते मिळाली होती. शशिकांत शिंदेंना मिळणारी मत चिन्हाच्या गोंधळामुळे गाडे यांना मिळाल्याचा दावा शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आला होता.