सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेला राडा अखेर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या ऐवजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
advertisement
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे ६५ पैकी ३५ जागांचे स्पष्ट बहुमत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि एका अपक्ष सदस्याला आपल्या गोटात खेचत सत्तांतर घडवून आणले. या राजकीय घडामोडींदरम्यान मोठा गोंधळ उडाला. शिवसेना शिंदे गटाच्या दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला होता.
मंत्र्यांचा संताप आणि विधानसभेत पडसाद
या राड्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी या प्रकरणाचे पडसाद थेट विधीमंडळात उमटवले. पोलीस अधीक्षकांनी घरगड्या सारखं काम केलं असल्याचा आरोप देसाई यांनी केला होता. मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की होत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल त्यांनी केला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना नेत्यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
