उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मध्यरात्री वर्षा निवासस्थानी दाखल झाले. काल, दिवसभर विधानभवनात सातारा जिल्हा परिषद प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
बैठकीत कोणत्या मुद्यावर चर्चा?
साताऱ्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद आज विधानभवनात उमटले. यावरून निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या (SP) निलंबनाचे आदेश दिल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या आदेशावर कायदेशीर आणि राजकीय भूमिका काय असावी, यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली असावी. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशावर सभापती राम शिंदे यांनी स्थगिती आणल्याने शिंदे गट नाराज असल्याचे म्हटले जाते.
advertisement
शिवसेना-भाजप वादावर पडदा पडणार?
गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिक मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये काही प्रमाणात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या बैठकीच्या माध्यमातून उभय नेत्यांमध्ये समन्वय साधून या वादावर पडदा पडणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. आज विधानभवनाचे कामकाज सुरू झाल्यावर या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात आणि सरकार यावर काय स्पष्टीकरण देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शिंदे गटात नाराजी...
साताऱ्यामध्ये थेट मंत्र्याला धक्काबुक्की झाल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे. भाजपने रडीचा डाव खेळत संख्याबळ नसताना अध्यक्षपद हिसकावून घेतले, यामध्ये पोलीस अधीक्षकांनी भाजपचे घरगडी म्हणून काम केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला होता. महायुतीत भाजपकडून गळचेपी होत असल्याने थेट शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
