मुंबई, कोकणसाह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस कोसळतो आहे. तिकडे सातारा जिल्ह्यातही कराड, पाटण, सातारा, कोरेगाव तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतो आहे. एकीकडे जिल्ह्यात जरी पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत असली तरी महाबळेश्वरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत एकूण 100 मिलिमीटरने कमी पावसाची नोंद झाली आहे.
advertisement
धरणांत पाणीसाठी कमीच:
साताऱ्यामध्ये हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली असून सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई ,कोरेगाव, कराड पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, अजूनही धरणांमध्ये म्हणावा असा पाणीसाठा जमा झालेला नाही. साधारण 30 ते 60 टक्क्यापर्यंत जिल्ह्यातील धरणे भरले आहेत. कोयना धरणातील पाणीसाठा सध्या 54 टीएमसी इतका झाला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पावसाची नोंद होत असते. मात्र गतवर्षाच्या तुलनेने 100 मिलिमीटर पाऊस कमी प्रमाणात नोंद झाली आहे. 2023 मध्ये 21 जुलै रोजी महाबळेश्वर तालुक्यामध्ये 2420 मिलीमीटर पाऊस पडला होता. मात्र त्याच्या तुलनेने 2024 ला 21 जुलै रोजी 2319 मिलिमीटर पाऊस पडला आहे आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचेही बोलले जात आहे. महाबळेश्वरचा वेण्णा लेक मात्र ओव्हर फ्लो होऊन वाहू लागला आहे.
राज्यात सर्वदूर मुसळधार:
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील विविध शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाने सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नागरिकांना रहदारी करण्यास अडचण निर्माण होत आहे.
विदर्भातील नागपूरमध्ये ही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या पावसाचा जनजीवनावरही परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते आहे. पुढील 24 तास राज्यावरील पावसाचा जोर हा कायम असणार आहे. विदर्भातील 3 जिल्ह्यांना तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईत मागील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
