माळशिरस-म्हसवड महामार्गावर आज सकाळी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपस्थित सर्व आंदोलकांना मटण जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनासाठी गर्दी जमवण्यासाठीच ही मटण पार्टी आयोजित केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गोरे म्हणाले, हे आंदोलन पाणी आणि जनतेच्या प्रेमातून झालेले नाही, तर निव्वळ स्टंटबाजी आहे. आमदार जानकर यांनी जाता-जाता हे आंदोलन केले असून, फक्त मटण पार्टीच्या बळावर त्यांनी गर्दी जमवली हे त्यांच्या या कृतीतून त्यांची आंदोलनाबद्दलची गांभीर्यहीनता दिसून येतं.
advertisement
या आंदोलनाचे मूळ कारण माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा-देवघर धरणातून पाणी देण्याशी संबंधित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे येथील शेतकरी सातत्याने पाण्याची मागणी करत आहेत. आमदारांनी या मागणीसाठी आंदोलन करणे योग्य असले, तरी त्यासाठी कार्यकर्त्यांना मटण पार्टी देऊन गर्दी जमवण्याची पद्धत चुकीची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेमुळे राजकीय नैतिकता आणि आंदोलनाचे स्वरूप यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी जानकर यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. लोकहितासाठीचे आंदोलन हे खऱ्या समस्यांवर आधारित असावे, निव्वळ देखावा नसावा, अशी प्रतिक्रियाही काही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. या मटण पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाने आणखीच जोर धरला आहे.
पुढील काळात विरोधक या मुद्द्यावरून आमदार जानकर यांना आणखी घेरण्याची शक्यता आहे. तसेच, सत्ताधारी पक्षही या संधीचा फायदा घेऊन जानकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करू शकतो.