रायगड: राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. आता रायगडच्या पेणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये एक एसटी चालक अंबा नदीला पूर आला असताना या पाण्यातून एसटी घालतो. यामुळे काही वेळ प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.
नेमकं काय घडलं?
रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्यांच्या वर असलेल्या पुलांवरून पाणी वाहत आहे. भेरव अंबा नदी पुलावरून पावसाचे पाणी ओसंडून वाहत असताना पाली बस स्थानकातून सुटलेली घोडेगाव मार्गे पेण बस अंबा नदीच्या पुलावर आली असता, पुलावरून पावसाचे पाणी जात असतानाही चालकाने थेट बस पाण्यात घातली. सुदैवाने बस पुलावरून पार झाली. मात्र थोडे जरी विपरीत घडले असते तर प्रवाशांसह बस वाहून गेली असती, आणि मोठा अनर्थ घडला असता. सदरचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायलर झाला असून संबधित चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
advertisement
बेजबाबदार पणा उठू शकतो जीवावर:
गेल्या वर्षभरात राज्यात एसटी बसच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये चालकांचा निष्काळजीपणा, काहीवेळा मद्यप्राशन करून एसटी बस चालवणे असे प्रकार समोर येत असतात. नाशिकमध्ये बस दरीत गेल्याची घटना देखील घडली होती. खरंतर सर्वात सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणून सर्वसामान्य लोक एसटीचा अवलंब करतात. त्यामुळे अशा बेजबाबदार चालकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत घ्या विशेष काळजी:
पावसाळ्याच्या दिवसांत नद्या नाल्यांना पूर येणे, पूलावरून पाणी वाहणे असे प्रकार घडत असतात. अशावेळी वाहनचालकांनी अशा वाहत्या पाण्यात वाहन घालू नये. तसेच डोंगराळ भागातून जात असताना दरड कोसळण्याचा धोका असतो, अशावेळी पूर्ण सुरक्षित मार्गाचा प्रवासासाठी अवलंब करणे नेहमीचं फायद्याचे असते. अशी काळजी घेतल्यास अनेक दुर्घटना टाळता येवू शकतात.
