गडावर गर्दीचा जनसागर
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
चेंगराचेंगरीचा थरार
गडावरील अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसर आणि गणेश दरवाजा हे मार्ग अत्यंत अरुंद आहेत. या अरुंद मार्गांवरून एकाच वेळी हजारो शिवभक्त जमा झाले. इथं गडावरून खाली उतरणाऱ्या लोकांचा लोंढा मोठा होता. तर खालून गडावर जाणाऱ्या लोकांसाठी जागाच उरली नाही, अशा स्थितीत वरुन खालच्या दिशेनं येणाऱ्या काही लोकांनी ढकलाढकली केली. रस्ते लहान आणि लोकांची संख्या प्रचंड असल्याने तिथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यात काही शिवभक्त खाली पडले आणि जखमी झाले.
advertisement
जखमींवर उपचार सुरू
ही घटना घडल्यानंतर जखमींना तातडीने गडाखाली आणून जुन्नर येथील शासकीय रुग्णालय आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
शिवजयंतीला शिवनेरीवर दरवर्षी लाखो लोक येतात, हे माहित असतानाही प्रशासनाकडून योग्य नियोजन झाले नसल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडावर पुरेशी यंत्रणा तैनात नव्हती, यामुळे हा प्रसंग घडल्याचा दावा केला जात आहे. शिवजयंतीच्या उत्साहात अशाप्रकारची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
