गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार अखेर उडाला. महायुतीनं विधानसभेप्रमाणेच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवत आपली जादू कायम ठेवली आहे. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय तर ठाकरेंची शिवसेना शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार आहे. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी कवितेतून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावरून शेलारांनी ठाकरेंना डिवचलं आहे.
advertisement
मराठी माणसा जागा हो.. मारली तुम्ही हाक
आव्हानाला दिली पाहा त्याने भरभरून साथ
दऱ्या खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला
स्वार्थी "मशाली"ला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला
"इंजिना"चे तर निशाण मिटले तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले !
मराठी माणसाचे हे यश पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले !!
नगरपालिकांमध्ये जे घडले तसेच मुंबईसह पालिकांमध्ये घडेल
मराठी माणूस तुम्हाला मोठ्या "सन्मानाने" पाडेल
शून्य अधिक शून्य बेरीज शून्य हा गणिती नियम खरा ठरेल !!
शेलारांच्या या टिकेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय. टीका-टिप्पणीनं फरक पडत नाही, आशिष शेलार काय बोलतात यावर राजकारण चालत नाही.
मशाली चिन्हाचा उल्लेख करत ओमराजेंना खिजवलं
नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरातच खराब कामगिरी केल्याचं दिसून आलं. त्यातही अंबरनाथ आणि धाराशिवसारख्या बालेकिल्ल्यात ठाकरेंना एकही जागा मिळवता आलेली नाही.धाराशिवमध्ये ठाकरेचे आमदार, खासदार असूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यावरुन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर जोरदार टीका केली. त्यांनीही शिवसेनेच्या मशाली चिन्हाचा उल्लेख करत ओमराजेंना खिजवलं आहे.
सत्ताधाऱ्यांना टिकेची आयती संधी
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुका या वैयक्तिक संपर्काच्या मानल्या जातात. त्यामुळेच सगळे पक्ष गावपातळीवर संघटना विस्ताराची संधी म्हणून पाहातात. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे यंदा या निवडणुकाही पक्षीय पातळीवर लढल्या गेल्या. प्रमुख पक्षांनी आपापले बळ वाढवण्याचा आणि पाळंमुळं रुजवण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण मविआनं ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इतर तीन पक्षांच्या तुलनेत जेमतेम यश मिळालंय. त्यांच्या शिवसेनेचं अस्तित्व शहरी भागापुरतंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना टिकेची आयती संधी मिळाली आहे.
