ठाणे : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचारानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. यानंतर आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करत आंदोलन केलं. आता या आंदोलनप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक असा खुलासा झाला आहे. आंदोलना आधी, आंदोलनावेळी आणि नंतरचे काही व्हॉइस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. आंदोलनाला नेतृत्व नव्हते पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा दावा पोलिसांनी केलाय. पोलिसांनी आता या आंदोलनाच्या तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत. अनेक आंदोलक बाहेरचे होते अशी माहिती पोलिसांनी दिलीय. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
advertisement
आंदोलनासाठी करण्यात आलेले फोन आणि व्हाईस रेकॅार्डिंग पोलिसांना सापडले आहे. हे आंदोलन पूर्व नियोजीत असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी ६८ जणांना अटक केलीय. यात कल्याण रेल्वे पोलिसांनी २८ जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी ४० जणांना अटक केलीय. ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तर १०० पेक्षा जास्त जण या प्रकरणी फरार आहेत. रेल्वे एक्ट, सरकारी मालमत्ता नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पुर्वनियोजीत गुन्हेगारी कट रचणे, सरकारी कर्मचारी जख्मी करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
ठाकरे गटावर शिवसेना नेत्याचे आरोप
बदलापूरमधील आंदोलनावरून आता राजकारणसुद्धा तापलं आहे. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी हे आंदोलन उद्धव ठाकरे गटाने केल्याचा आरोप केलाय. वामन म्हात्रे यांनी म्हटलं की, रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणारी बाहेरची लोक होती. मुंब्रा, पनवेल, नवी मुंबई या भागांमधून लोक आली होती. उद्धव ठाकरे गटाने जाणीवपूर्वक आंदोलन केलं, बदलापूर शहराला डाग लावण्याचा प्रयत्न केला गेला.
संजय राऊतांनी दिलं उत्तर
आंदोलनावरून विरोधकांवर होत असलेल्या आरोपावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं की, लोकांचा संताप रस्त्यावर उतरला आहे. ते गुन्हेगार नाहीत. अशा गोष्टीत विरोधकांचा हात कसा असू शकतो? पोलिसांची भीती राहिलेली नाही. मुलींना हात लावायची हिंमतच कशी होते. हे सरकार लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये काहीच करत नसल्याचंही राऊत म्हणाले.